आदिवासी कला संस्कृती साहित्य अकादमी व
संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना महाराष्ट्र राज्य
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
पहिले राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संस्कृती संमेलन, नाशिक
अध्यक्षीय भाषण
राघोजी भांगरे व तमाम क्रांतीवीरांना विनम्र अभिवादन या साहित्य संमेलनाचे आयोजकांनी फोन करून सांगितले की आमच्या संमेलनाचे अध्यक्ष ही महिलाच असावी असे ठरले आहे. खरं तर महिला किंवा पुरुष हा भेद करणे हा त्यामागचा उद्देश नव्हता तर हा मातृमुलक समाज आहे ही यामागची भूमिका आहे. भिन्न लिंगाचा निसर्गत: जो फरक आहे तो मान्य; पण आदिवासी समुदायात महिला पुरुष भेदभावाची पध्दत दिसत नाही. म्हणुन इथे स्त्रीवादाचा जन्म झाला नाही.
पिता रक्षति कौमार्य,
भर्ता रक्षति यौवने,
रक्षत्नि स्थाविर पुत्रा,
न स्त्री स्वातंत्र्य महर्ती
अशी परंपरा व स्त्री ही भोगवस्तू मानणारी मनुप्रजाती आदिवासी नाहीत आणि आदिवासींना संस्कृती आहे ते आध्यात्मिक आहेत पण त्यांचा कोणताही धर्म नाही. व्यक्तीगत पुजापाठ नाही. ते सगेसोयरे मिळून सामुदायिक पुजन करतात. तेव्हा हजारो वर्षांपासून आपली संस्कृती सभ्यता जगणारा समाज त्याची जीवनशैली, परंपरा, ज्ञान हे आदिवासीत्व विसरलेले आदिवासी व गैर आदिवासींनीही लक्षात घेणे गरजेचे आहे. गैर आदिवासी स्त्री प्रमाणे आदिवासी स्त्रीचे बाईपण हे असह्य व दुःखद नाही. त्यांच्या जीवनशैलीत भोगवाद नाही. भोगवाद हा स्त्रीच्या बाबत भोग किंवा भौतिक लालसा असेल तो विकार, विध्वंस, भ्रष्टाचार, अनैतिकतेला जन्माला घालतो. सहजभाव नष्ट होतो व असहजभाव निर्माण होतो. असहजतेमुळे शंका कुशंका, संभ्रम तथा विकृती तयार होते. विकृती ही विनाशाकडे नेत असते. माणुस हैवान, पिशाच्चवृत्तीचा बनत असतो. ही पिशाच्चवृत्ती कोणत्याही नातेसंबंधात, व्यवहारात बाधा निर्माण करते.
धर्म आणि धर्माच्या शिकवणुकीतून स्वर्ग, नरक, मोक्ष, पाप, पुण्य, नशिब मानगुटीवर बसवले गेले यात गैर आदिवासी स्त्रिया फसल्या. मात्र स्वतंत्र व्यवस्थेतील आदिवासी स्त्रिया बचावल्या. भोंदू, साधू, बाबा, बुवा, जोतिष अशा दांभिकतेला त्या बळी गेल्या नाहीत. अठरापगड देवांना पुजण्याची गरज तिला पडली नाही. कारण तिच्याकडे सामुदायिकता, सहअस्तित्व, संस्कृती, सभ्यता, सांस्कृतिक वारसा होता. जल जंगल जमीन होती. तिला सुरक्षा व सन्मान होता. आदिम अवस्थेतील समाजात समानता होती. ती अजुनही आहे. पण जसाजसा नगराशी, शहरासोबत, नागरी समाजाशी संपर्क येऊ लागला, तसा मुख्य प्रवाह म्हणत त्याचे अनुकरणास सुरुवात झाली आणि भयविरहित मुक्तपणे जगणारी आदिवासी स्त्री हळूहळू भयग्रस्त होत राहिली. दारु आणि आदिवासी हे समिकरण जोडले गेले. त्यामुळे ती अधिकच खचत गेली. पुर्वीच्या काळी विशेष प्रसंगी घरगुती मोहाची दारू काढली जायची आणि नातेवाईक, सगेसोयरे महिला पुरुष मिळून मिसळून एकमेकांच्या संगतीत दारू पित असत. जेव्हा बाहेरील व्यापारी गावागावात शिरले व दारुचा व्यवसाय सुरू केला तेव्हा पासून दररोज दारू पिण्याची नवी परंपरा उदयास आली. दिवसेंदिवस ते प्रमाण वाढतच राहिले. त्याचा परिणाम समाजावर, कुटुंबावर विशेषतः स्त्रियांवर झाला. संस्कृतीची वाहक असणारी आदिवासी स्त्री ही विकृतीची बळी पडली. आदिवासी पुरुषही पुरुषप्रधान व्यवस्थेचे अनुकरण करू लागले. मग ती व्यवस्था मानगुटीवर कधी बसली समजलेच नाही. मुक्त, स्वतंत्र समाज हा गुलामीच्या विळख्यात सापडला. कुटुंबात महिलांना जाच होऊ लागला. हा जाच सहन करत जगणा-या तसेच जाच झुगारून जगणा-या दोन्ही प्रकारच्या आदिवासी स्त्रीया आहेत.
आदिवासी समाज हा कायमच संघर्षशिल राहिला. इंग्रज सत्तेविरुद्ध, सावकार व्यापारी जमिनदार विरोधात त्याने चळवळी उभारल्या. संघर्ष केला. निसर्गाच्या सहवासात राहून हिंस्र प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करताना खुप हिंमतीने जगला. त्याला प्रत्येक वेळी स्त्रीयांची साथ होती. नागरी समाजाहून या अबोल, अव्यक्त आदिवासींचे जीवन, त्यांचे जगणे, त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत. मुख्य प्रवाहात व पुरुषप्रधान संस्कृतीच्या व धर्माच्या प्रभावात आल्याने काही नवे प्रश्न आदिवासींमध्ये निर्माण झाले. इतर आदिवासीतेतर महिला ज्यांना धर्म आहे, त्या बुवाबाजीला बळी पडतात, त्यांच्या अंगात देवी येते,भूत येते; त्या प्रमाणात आदिवासी स्त्रियांच्या अंगात देवी भूत येत नाही. जादुटोणा आहे, पण स्वत:ची एक स्वतंत्र व्यवस्था असल्याने येथे तिची फसगत होत नाही. अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचे उदाहरण नाही. सासरी जाळून मारल्याच्या घटना नाहीत. असेलच तर शोधून काढले पाहिजे असे आहे. छळापायी विहिरीत, तलावात उडी घेऊन जीव गमावला नाही. नव-याने बदडले किंवा पटत नसेल, तर त्याला सोडून दुसरा घरोबा करतात. त्यास समाज मान्यता आहे. मुलीस घरजावई आणण्याची प्रथा आहे. तिला जगण्यासाठी आधार म्हणून जमिन दिली जाते. आदिवासी गर्भजल परिक्षण करत नाही. ते त्यांचे शैक्षणिक प्रमाण कमी असते, त्यामुळे किंवा तंत्रज्ञानाचे विषयी अज्ञान असु शकते. पण मुलगा व मुलगी यांच्यात ते फरक करत नाहीत. पती निधनानंतर तिचे केसवपन करुन अंधार कोठडीत रुखीसुकी खायला न लावता प्रसंगी देर गरसोळी बांधता येते. घरादारात सहज वावरता येते.
आदिवासीत चोरी, बलात्कार, हिंसा नाही. देवाधर्माचे अवडंबर नाही. संस्कृतीनुसार सहज जीवन जगणाऱ्या समाजावर धर्म असलेल्यांच्या प्रभावामुळे ह्या चुकीच्या गोष्टींचा शिरकाव झाला. भारतीय संविधानाने न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही प्रणाली दिली आहे. ही लोकशाही आदिवासी पुर्वीपासून जगत आले आहेत. माझ्यापुढे बसलेली सर्व मंडळी ही सुशिक्षित आहेत. समाजाला समजून घेण्याची आपली परंपरा, संस्कृती, सभ्यता, इतिहास संशोधन करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. आपले क्रांती नायक नायिका कोण आहेत हे समजून घेतले आहेत. आपण क्रांतीकारकांचे वारसदार आहोत. आपले पूर्वज देशभक्त होते. म्हणुनच त्यांनी स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडात झोकून दिले. हा इतिहास पुस्तकात नसेल, पण आमच्या मस्तकात व या जमिनीवर कोरला आहे. आदिवासी क्रांतीवीरांच्या रक्ताने ही भूमी लाल झाली आहे. जेव्हा देशात मणिपूर जाळले जाते, महिलांची नग्न धिंड काढली जाते, अंगावर मुतले जाते, बलात्का-यांना पेढे भरवून सत्कार करण्यात येतो, अजुनही अन्नाविना, औषधाविना, शुध्द पाणी हवा या विना लोक मरत आहेत. शाळा बंद आणि शिक्षणाचे बाजारीकरण, लुटमार, बलात्कार, जाळपोळ, हिंसा, वेळोवेळी महापुरुषांचा अपमान केला जातो. गेल्या दहा वर्षांच्या काळात असंख्य पटीने यात वाढ झाली आहे. तेव्हा धर्म नसलेल्या दहा ते बारा कोटी आदिवासींच्या गुणांचा प्रभाव या कुप्रवृत्तीवर पाडलाच पाहिजे. आदिवासींच्या जीवनाचा आदर्श लोकांनी अंगिकारने भाग पाडले पाहिजे असे आपण स्वतः आपल्या पूर्वजांच्या सारखे बनलो पाहिजे.
आदिवासी मुळातच संशोधक आहे. त्याने दगडावर दगड घासून अग्नी तयार केला. बीजांचा शोध लावला, शेती करु लागला. अनेक प्रयोग करत आपल्या जीवनात बदल घडवत गेला. ज्याने पशुपक्ष्यांच्या, निसर्गाच्या सानिध्यात राहून ज्ञान मिळवले. स्वतःची बोलीभाषा, कला, नृत्य, वाद्य, लिपी तयार केली. शिकारीचे तंत्र आत्मसात केले. वनौषधींची समज आली. हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण करण्याचे कसब शिकले; पण धर्म निर्माण केला नाही. कमी कपड्यात अर्धनग्न राहुन सुध्दा लैंगिक अत्याचार केले नाहीत. त्या माणसाने या अलिकडच्या बदलत्या व मानसिक बिघाड झालेल्या विकृत जगाचे मार्गदर्शक बनुन रस्ता दाखवण्याचे काम करण्याचे धाडस दाखवले पाहिजे.
विकसित भारत, नया भारत, आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, स्मार्ट इंडिया, मेट्रो सीटी होत असताना आदिवासींचे जल जंगल जमीन पहाडासह नष्ट होत आहेत. आदिवासी विस्थापित होत आहे. आदिवासी जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यांचे संविधानाने दिलेले हक्क डावलले जात आहेत. न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यांना नक्षलवादी ठरवले जात आहे. आदिवासी महिलांना नग्न करून, योनीत बोटे घालून धिंड काढली म्हणजे देश आर्थिक महासत्ता होणार आहे का? हक्क अधिकाराची जाणीव करून देणाऱ्या पर्यावरणवादी सोनम वांगचूकला रासुका कायद्याखाली अटक होते. नैसर्गिक संसाधने वाचवणा- यांवर जहाल नक्षलवादीचा ठपका लावला जातो. आश्रमशाळेत शिक्षक नाहीत. दवाखान्यात औषध नाही, डॉक्टर नाहीत. दवाखान्यात नेण्यासाठी वेळेवर अॅम्बुलन्स नाही. मृत पेशंटला दहा दहा किमी खांद्यावर न्यावे लागते. कितीतरी गरोदर महिला पोटातील बाळासह वाटेतच मरुन पडल्या. मेट्रो सीटीत लाखो महिला तस्करीमध्ये सापडतात. उच्च शिक्षण घेताना अनेकजणी डॉ. पायल तडवी होतील. त्यांचा आवाज दाबून टाकला जातो. याबाबत आदिवासी समाजाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
आदिवासींच्या मुलींनी गैर आदिवासी सोबत लग्न केले, तर जमात प्रमाणपत्र रद्द करण्याचे षडयंत्र चालविले जाते. हा नियम फक्त मुलींसाठी आहे. आदिवासी मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळेल हा 17 जुलै 2025 ला छत्तीसगड सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. देशभरातील उच्च शिक्षित अनेक आदिवासी महिला खुष झाल्या व पुरुष नाखुश झाले. खुश व नाखुश होणाऱ्यांची मानसिकता ही हक्क, अधिकार, न्याय, समानता ही भाषा सांगते का? पण मुळात समाजात महिलांना जो सन्मान व सुरक्षा मिळत होती, ती त्या शिक्षण घेणाऱ्या मुलीस न मिळाल्याने कोर्टाकडे धाव घ्यावी लागली. तेव्हा ही चूक कोर्टात न्याय मागायला जाणाऱ्या त्या मुलीची आहे का? निश्चित नाही तर मुख्यधारेच्या प्रवाहात सामील झालेली ही सांस्कृतिक हानी आहे असे मी मानते. सामाजिक कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधी व साहित्यिकांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. खुप आव्हाने आहेत. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कॅबिनेट दर्जाचे लोकप्रतिनिधी आमचे नरहरी दादांना मंत्रालयावरुन उडी मारावी लागते. ही परिस्थिती आहे. आदिवासी मंत्रालय महिलांसाठी काय देतो? राणी दुर्गावती महिला सशक्तीकरणच्या बजेटमध्ये महिलांसाठी काय तरतूद आहे? शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, गायी, म्हशी, शिलाई मशीनच का? पण उच्च शिक्षण, प्रशिक्षण कायदेविषयक मार्गदर्शन, लोप पावत असणाऱ्या संस्कृतीचे संवर्धन, साहित्य संमेलनाचे आयोजन, महिला धोरण, कलागुणांना वाव देण्यासाठी महिला मेळावे यासाठी काही दिसत नाही. आदिवासी महिलांचे आरोग्य, शिक्षण, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक स्थिती काय आहे? मुख्यधारेत आमचे जंगल, जमीन, पहाड, महिला, ज्ञान, कला, यांची चोरी करत आहेत. विस्थापनामुळे भाषा, संस्कृती, सभ्यता नष्ट होत आहे. युजीसी बील विरोध, समान नागरी कायदा, डी लिस्टींग यासाठी आदिवासी कार्यकर्ते लेखक राजकीय नेते यांची मोठी जबाबदारी आहे. अर्धनग्न आदिवासींनी पुर्ण कपडे घातले व पूर्ण कपड्यातील समाज अर्धनग्न राहुन पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावात येत आहे. तेव्हा विकासाची परिभाषा कोणती असावी? म्हणून आदिवासींनी मुख्यधारेत न जाता आपल्या मूळ धारेकडे परत फिरावे. आपली कल्याणकारी सामुदायिक व्यवस्था, आपले घर मजबूत व सुशोभित करावे. आपल्या क्रांतीनायकांची ओळख करून घ्यावी. शुध्द हवा, शुद्ध पाणी, अन्नधान्य व मानवी सभ्यता त्याला सांभाळणारा जल जंगल जमीन हा आमचा जगण्याचा मार्ग प्रशस्त करावा लागेल. या माणूस असलेल्या समाजातील माणुसकी कायम जीवंत ठेवावी लागेल.
आमू आखा... एक छे..!
उलगुलान जिंदाबाद
आप की जय
जय आदिवासी
कुसुमताई अलाम, गडचिरोली
14/2/2026
.JPG)
0 comments :
Post a Comment